विज्ञान व तंत्रज्ञानातील स्वर्णजयंती पाठ्यवृत्ती

विज्ञान व तंत्रज्ञानातील मुलभूत  संशोधन सध्या ज्ञान निर्मितीसाठी आणि एकूणच सर्वसमावेशक विकासासाठी किती आवश्यक आहे याची आता सर्व जगाला हळूहळू कल्पना येऊ लागली आहे , आणि म्हणूनच भारतासारखा महासत्तेचं स्वप्न  बघणारा देश म्हणूनच या मूलभूत संशोधनावर व्यापक प्रमाणात लक्ष केंद्रित करत आहे. संशोधनाचे पुढील काळातील हे महत्व लक्षात आल्यामुळे अशा संशोधनाला  चालना देण्यासाठी भारत सरकार व विज्ञान-तंत्रज्ञान विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. अशा अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर संशोधन करणाऱ्या युवा शास्त्रज्ञांना  दिली जाणारी स्वर्णजयंती पाठ्यवृत्ती. २०१२ -१३ च्या या पाठ्यवृत्तीसाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून दि. १५ मे २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.   

पाठ्यवृत्तीबद्दल :-     

१९९७ साली भारताला स्वतंत्र होऊन ५० वर्षे पूर्ण झाली.स्वातंत्र्याची ही सुवर्ण जयंती साजरी करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (Department of Science and Technology) त्या वर्षापासून म्हणजे १९९७ पासून स्वर्णजयंती पाठ्यवृत्तीयोजना राबवण्यास सुरुवात केली. या योजने अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विविध ज्ञानशाखांमध्ये ठराविक युवा शास्त्रज्ञांना त्यांचे मुलभूत संशोधन चालू ठेवण्यासाठी त्यांच्या नियमित वेतनाव्यतिरिक्त विशेष आर्थिक सहाय्य पुरवले जाते. भारतात किंवा भारताबाहेर राहणाऱ्या हुशार व संशोधनाच्या आवडीने झपाटलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान शाखेतील भारतीय विद्यार्थ्यांना दरवर्षी भारत सरकारकडून स्वर्णजयंती पाठ्यवृत्ती प्रदान केली जाते.  फक्त विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रमुख ज्ञानशाखांमध्ये मूलभूत संशोधन करण्यासाठी ही पाठ्यवृत्ती दिली जाते. स्वर्णजयंती पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या अर्जदाराला पाच वर्षांसाठी दरमहा पंचवीस हजार रुपयांची पाठ्यवृत्ती ( तसेच या संपूर्ण कालावधीत त्याचे नियमित वेतनही चालू राहते) व  त्याच्या संशोधन प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व साधनांची रक्कम त्याला दिली जाते. या पाठ्यवृत्तीसाठी निवड झालेल्या शास्त्रज्ञास भारतातील कोणत्याही संशोधन संस्थेमध्ये त्याचे पुढील संशोधन सुरु ठेवता येईल.

आवश्यक  अर्हता :- 
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाची ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांना ( भारतात किंवा भारताबाहेर राहणाऱ्या)  खुली आहे.  या पाठ्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे विज्ञान, अभियांत्रिकी किंवा वैद्यकशास्त्र या शाखांमधल्या कोणत्याही एका शाखेशी संबंधित विषयामधील पी.एच.डी. पदवी असावी. त्याचप्रमाणे, दि. ३१ डिसेंबर २००९ रोजी अर्जदाराचे वय ३० ते ४० च्या दरम्यान असावे. तसेच, अर्जदाराचे त्याच्या स्वत:च्या संशोधन विषयाला त्याचं उत्कृष्ट योगदान असावं, म्हणजे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झालेले असावेत. याबरोबरअर्जदाराला, जर त्याची पाठ्यवृत्तीसाठी निवड झाली तर त्याचे पुढील संशोधन चालू ठेवण्यासाठी त्याच्या संस्थेकडून आवश्यक ते प्रशासकीय सहकार्य दिले जाईलअशा स्वरूपाचे त्याच्या संबंधित संस्थेच्या / विद्यापीठाच्या / विभागाच्या विभागप्रमुखाचे एक पत्र त्याला  पाठवावे लागेल.

अर्ज प्रक्रिया: 
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वेबसाईटवर अर्जप्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. त्यात दिलेल्या नमुन्यामध्येच अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.  सोबत स्वत:च्या आतापर्यंतच्या सर्व संशोधन प्रकल्पांबद्दल लघुनिबंध स्वरुपात माहिती त्याने पाठवावी. अंतिम निवडीपूर्वी स्वत:च्या प्रकल्पांविषयी व स्वत:विषयीची इतर माहिती अर्जदाराला विभागाकडे सुपूर्द करावी लागेल.  अर्जदाराने त्याच्या अर्ज व संशोधन प्रकल्पासहित इतर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या सॉफ्ट व हार्ड प्रती विभागाच्या नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवावे.  आवश्यक कागदपत्रांच्या व प्रकल्पविषयक हार्ड प्रती पोस्टाने पाठवाव्यात. अर्ज प्रक्रियेशी संबंधित याव्यतिरिक्त कोणतीही शंका असल्यास अर्जदार खालील पत्त्यावर संपर्क साधू शकतो.
Head
SERC
Department of Science & Technology
Technology Bhawan
New Mehrauli Road
New Delhi-110 016.
Tel: 011-26590370
Email : bghari @nic.in
अंतिम मुदत:-
अर्ज करण्याची अंतिम मुदत दि.
१५ मे २०१३ आहे.  
महत्वाचे  दुवे :-
http://www.dst.gov.in
http://www. serb.gov.in

वरील लेख ( विज्ञान व तंत्रज्ञानातील स्वर्णजयंती पाठय़वृत्ती) लोकसत्ताच्या करिअर वृत्तांत या पुरवणीत दि.१५ एप्रिल २०१३ रोजी प्रकाशित झाला.

Comments

Popular posts from this blog

हिनरीक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रविद्या शिष्यवृत्ती

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 'देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या'

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाताय?